New Delhi : खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी वेधले बैलगाडा शर्यतीकडे संसदेचे लक्ष

एमपीसी न्यूज- शिरूर लोकसभा मतदारसंघामधून विजयी झालेल्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे लोकसभेमधील पहिलेच भाषण लक्षवेधी ठरले. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्याकडे संसदेचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, दुष्काळ, आदिवासी भागात वनऔषधी प्रकल्प अशा विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. बैलगाडा शर्यत बंदीकडे संसदेचे लक्ष वेधत असताना त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले. पुढील काळात बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत राहून हा लढा यशस्वी करणार असल्याचे सूतोवाच केले.

सर्वोच्च न्यायालयाने सात मे 2014 रोजी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली त्यानंतर तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गॅझेटमध्ये दुरुस्ती करत बैलगाडा शर्यती चालू केल्याची घोषणा केली. परंतु पेटा सारख्या संस्था सर्वोच्च न्यायालयात गेल्याने शर्यतीवर पुन्हा बंदी आली. त्यानंतर तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धा चालू करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले व मोठे आंदोलन तयार झाले यातूनच तमिळनाडू सरकारने जल्लीकट्टू चालू करण्याचे संदर्भात कायदा तयार केला त्यानंतर कर्नाटक सरकारने ही बैलगाडा शर्यती बाबत वटहुकूम काढून शर्यतीत परवानगी दिली.

या दोन्ही सरकारच्या धर्तीवर तसेच या कायद्यातील त्रुटी दूर करा महाराष्ट्र शासनानेही एप्रिल 2017 मध्ये सक्षम कायदा तयार केला परंतु सदर कायद्यात मुंबई येथील अजय मराठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले यापूर्वी 2014 ला सर्वोच्च न्यायालयाने या विषयात बंदी घातल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या विषयांमध्ये सुनावणी घेण्यास नकार देत महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली त्यानुसार महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पिटीशन दाखल करून बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्याची विनंती केली.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत पाच न्यायाधीशांच्या स्वतंत्र घटना पीठाकडे वर्ग केली आहे याबाबत तात्काळ सुनावणी व्हावी असा विनंती अर्ज अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने मार्च 2019 मध्ये करण्यात आला परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही 30 जून पर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुट्टी आहे त्यानंतर कोर्ट चालू झाल्यानंतर अखिल भारतीय शर्यत संघटनेच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयास बैलगाडा शर्यती बाबत तात्काळ सुनावणी घ्यावी असा विनंती अर्ज करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारच्या वतीने ही तात्काळ सुनावणी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज करण्यात येणार आहे.

किल्ले रायगडला राजधानीचा दर्जा द्या

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये किल्ले रायगडला राजधानीचा दर्जा द्यावा अशी मागणी केली. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विचार होत असेल तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा देखील विचार झाला पाहिजे असे सांगत रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करून राजधानी केल्यास ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.