Pimpri : कोरडा दिवस पाळा; हिंवताप, डेंग्यूबाबत काळजी घ्या ; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना आलेला पूर ओसरला असला, तरीही नागरिकांना हिंवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आदींसारखे संसर्गजन्य आजार होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

शहरातून वाहणा-या पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना पूर आला होता. अनेक सोसायट्या, चाळी, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. आता हा पूर ओसरला असला, तरीही नागरिकांना साथीचे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हिंवताप हा आजार एनॉफिलस तर डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिसइजिप्ट हे डास कारणीभूत असतात. एनॉफिलस अस्वच्छ, तर एडिस डासांची मादी घरात साठवलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते.

हिंवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला डास चावला, तर रोग्याच्या रक्तातील या रोगाचे विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालवा लागणार आहे. त्यापासून संरक्षण होण्यासाठी आणि डास चावू नये, यासाठी डास उत्पत्तीस्थळे नष्ट करा आणि होणा-या या संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी

घरात पाणी साठविण्याच्या भांड्यांतील पाणी वापरून भांडी कोरडी करा, त्यानंतर पुसूनच त्यामध्ये पाणी भरा, घरातील मोठ्या पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा, फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजच्या खालील ट्रे मधील पाणी दर आठवड्याला काढा, अंगणातील, गच्चीवरील भंगार मालाची त्वरीत विल्हेवाट लावा, घराभवतीची पाण्याची डबकी बुजवा किंवा त्यातील पाणी वाहते करा, आजुबाजुची डासोत्पती स्थानांबाबतची माहिती महापालिका आरोग्य विभागाला कळवा, त्या ठिकाणी औषध फवारणी करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.