Mumbai : आता बहुमत सिद्ध करावे लागणार ! त्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत
एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप झाला आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने भाजपने सरकार स्थापन केले. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता या सरकारला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर केले आहे. परंतु शरद पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या मागे राष्ट्रवादीचे किती आमदार असतील हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. अजित पवार यांच्या भूमिकेला माजी मंत्री सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांची सहमती असून 30 ते 35 आमदार अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे देखील बोलले जात आहे.
आज दुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.