Pune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

पुणे शहराची लोकसंख्या जवळपास 50 लाख आहे. यामध्ये पाच लाख लोकसंख्या पुणे शहरात रोज ये – जा करते. महापालिकेत 11 गावांचा झालेला समावेश, शिवाय महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मात्र, महापालिकेने पाणीकराराचा मसुदा नुकताच जलसंपदा विभागाकडे सुपूर्द केला आहे. सर्व पडताळणी केल्यानंतर प्रत्यक्षात डिसेंबरपासून नवीन पाणीकरार अस्तित्वात येणार आहे. हा पाणीकरार सहा वर्षांसाठी असून 2025 पर्यंत राहणार आहे. करारानुसार पुणेकरांना केवळ 11.50 टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणीसाठा कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या खडकवासला धरणात 1.66 टीएमसी, पानशेत 10.65, टेमघर 2.29 आणि वरसगाव धरणांत 12.82 असा एकूण 27.52 म्हणजेच 94.04 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 21.14 टीएमसी म्हणजेच 72.52 टक्के पाणीसाठा होता. नवीन सरकार स्थापन होत नसल्याने पुणेकरांच्या पाण्याचा निर्णय होत नाही. कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जातो.

या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. धरणांत अतिरिक्त पाणी साठविता येत नसल्याने 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले. हे पाणी पुणेकरांना मिळाले असते तर उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नसती. सध्या महापालिका धरणांतून रोज 1350 एमएलडी पाणी उचलते. पुणेकरांना रोज पाणी मिळण्याची सवय आहे. अन्यथा आरडाओरड सुरू होते. त्याची दखल घेऊन माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणीकपात न करण्याचे आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.