Pimpri : वाचनात माणूस घडविण्याचे सामर्थ्य – उद्धव साळवे

‘शब्दब्रहम’कडून मुक्त वाचनालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – सध्याचे युग हे मोबाईलचे असले, तरी या माध्यमाच्या अतिआहारी जाणे योग्य नाही. वर्तमानपत्रे, नियतकालिके वा ग्रंथवाचनातच ख-या अर्थाने माणूस घडविण्याचे सामर्थ्य आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते उद्धव साळवे यांनी येथे व्यक्त केले.

चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रहम काव्य योगसंस्कार व विविधांगी सेवा संस्थेच्या वतीने टाटा मेमोरिअलच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे दिवंगत अधिकारी व रसिक वाचक सुरेश कृष्णा जाधव यांच्या स्मृत्यर्थ योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिराच्या परिसरात साळवे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे प्रमुख प्रभाकर चव्हाण, शाहीर वसंत घाग, स्मिता जाधव, सरिता चव्हाण, वैशाली कुंजीर, इंदुमती कांबळे, पूजा फडतरे, ज्ञानेश्वर गवस, चंद्रकांत आंब्रे व अन्य उपस्थित होते.

प्रभाकर चव्हाण म्हणाले, “लहान वयापासूनच मुलांवर वाचनाचे संस्कार व्हायला हवेत. वाचनाने मुले बहुश्रुत होतात. भाषा, सामान्य ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी वर्तमानपत्रे वाचालयाच हवीत. मोबाईलसारख्या माध्यमाला मर्यादा असून, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे वाचन कसे वाढवता येईल, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक वर्तमानपत्राची वेगळी शैली असते. त्यात माहितीचा खजिना असतो. तो मुलांना खुला करून दिला पाहिजे. शब्दब्रहमचा हा उपक्रम त्यादृष्टीनेच असून, मुलांसह सर्वांनीच याचा लाभ घ्यावा”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.