Talegaon Dabhade : संतांच्या पायधुळीने जीवन धन्य होते- हभप चंद्रकांत महाराज वांजळे
एमपीसी न्यूज- संत ज्या मार्गाने जातात, त्या मार्गाची माती माझ्या अंगाला लागावी व त्यांच्या पायाची धूळही मला लागावी. त्या योगाने होणारे नाही असे काहीच नाही. संतांच्या शिवाय परमपदाला पोहोचता येत नाही. हरीच्या प्राप्तीसाठी हरीचे पाय धरावे लागतात असे मत हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी मंगरूळ, तालुका मावळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते.
तिस-या दिवसाच्या किर्तन सेवेत हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी, संत मारगी चालती l त्यांची लागो मज माती ll1ll काय करावी साधने l काय एक नव्हे तेणे ll2ll शेष घेईन उच्छिष्ट l धाय धणीवर पोट ll3ll तुका म्हणे संतां पायी l जीव ठेविला निश्चयी ll4ll या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण केले.
हभप चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले की, तुकाराम महाराज म्हणतात संत ज्या मार्गाने जातात, त्या मार्गाची माती माझ्या अंगाला लागावी व त्यांच्या पायाची धूळही मला लागावी. त्या योगाने होणार नाही असे काहीच नाही. त्यामुळे इतर साधने काय करायची आहेत ? संताचे उच्छिष्ट मी तृप्ती होईपर्यंत सेवन करीन, संताच्या पायी मी आपला जीव निश्चयाने अर्पण केला आहे. असे सांगत महाराजांनी संत कबीर व संत रोहिदास यांचे दाखले देत उपस्थिताना अंतर्मुख केले.
यावेळी वैराग्यमुर्ती हभप शंकर महाराज मराठे, हभप रोहिदास महाराज धनवे, तुकाराम महाराज झाड पादुका ट्रस्टचे अध्यक्ष भरत महाराज येवले, माजी सरपंच तानाजी येवले, हभप सीताराम मराठे, हभप महादुबुवा नवघणे, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे, गायनाचार्य हभप पांडुरंग वारींगे, हभप दत्तोबा मालपोटे, भजन सम्राट नंदकुमार शेटे, हभप धोंडीबा केदारी, हभप रमेश खोंडगे, हभप शिवाजी वारींगे, आंबळे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष गोविंद आंभोरे, हभप नानाभाऊ लोंढे, हभप बाळकृष्ण चव्हाण, उद्योजक शहाजी मराठे, माजी सरपंच नवनाथ मोढवे,माजी सरपंच शिवाजी पवार, हभप पांडुरंग पवार, हभप बाळोबा वारींगे, हभप दीपक वारींगे, हभप नानासाहेब घोजगे, आंबळे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव दत्तात्रय वारींगे हभप बाबाजी भांगरे, उद्योजक सोमनाथ पवार, प्रकाश कलवडे, हभप बजरंग तांबोळी, माजी सरपंच संदीप गायकवाड, माजी सरपंच भरत घोजगे, विजय देशमुख, रामदास तांबोळीसह ग्रामस्थ मंडळी व पंचक्रोशीतील भाविकजण मोठया संख्येने उपस्थित होते.