मुख्यमंत्र्यांनी काढला ‘काट्याने काटा’, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते आझम पानसरे यांनाही भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळे करून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या वारंवार येऊन धडकू लागल्याने शहरात भाजपचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मात्र चांगलाच डळमळीत झाला होता. पिंपरी-चिंचवड शहराचा आपण कायापालट केला असल्यामुळे विकासकामांच्या जोरावर पिंपरी-चिंचवडकर आपल्याला पुन्हा सत्ता देतील, या भ्रमात अजित पवार राहिले. मात्र ते त्यांच्या टीममध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कमी पडले. राष्ट्रवादीच्या प्रचाराची सर्व धुरा अजित पवार यांच्या एकट्याच्या खांद्यावर राहिली. माजी आमदार विलास लांडे व आण्णा बनसोडे यांनी शहर पातळीवर प्रचाराची सूत्रे हातात घेणे अपेक्षित होते, मात्र बनसोडे फारसे सक्रिय राहिले नाहीत आणि लांडे यांनी पुत्रप्रेमापोटी इंद्रायणीनगर प्रभागातच तळ ठोकला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत नेऊ शकेल, असा एकही स्थानिक नेता सक्रिय नव्हता. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला.
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याबरोबर खासदार अमर साबळे तसेच अॅड. सचिन पटवर्धन, आझम पानसरे यांच्यासह भाजपच्या कोअर टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवून मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या बँकेत तुमचे मत ठेवण्याऐवजी भाजपच्या बँकेत पाच वर्षांसाठी मत ठेवा, आम्ही शहराचा पाचपट विकास करून दाखवतो, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.