सतगुरुवर विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती – श्री शंभुनाथ तिवारी
एमपीसी न्यूज – सतगुरु हा अंतर्यामी असतो. प्रत्येक भक्ताचे मन तो जाणत असतो. सतगुरुवर विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे, असे मत यावेळी महाराष्ट्र समागम केंद्रीय प्रचारक श्री शंभुनाथ तिवारी यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे अध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित होते.
ते म्हणाले की, सतगुरू मनुष्यांच्या शब्दांकडे पाहत नाही. तो मनुष्याच्या कर्माकडे लक्ष देत असतो. सतगुरु हा एक शिल्पकार आहे. तो मनुष्यामध्ये असलेले अवगुण दूर करीत सुंदर मानवतेची मूर्ती बनविण्याचे कार्य करीत असतो.
सतगुरु हा प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये दिशा-दर्शकाचे कार्य करीत असतो. परंतु आज मनुष्यामध्ये सतगुरु प्रति जागृती असणे तितकेच आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी भक्तांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा भोसले यांनी केले. अंगद जाधव यांनी आभार मानले.