शेतकऱ्यांना भीक नको, उत्पन्नाला रास्त भाव द्या – बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूर ते वडनगर शेतकरी आसूड मोर्चा

एमपीसी न्यूज – शेतक-याचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून शेतक-याच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा आणि इतर मागण्यांसाठी येत्या 11 एप्रिलला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव नागपूर ते नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर, असा शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार कडू म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही सरकारच्या काळात शेतकऱ्यांची लूटच होत आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले हे सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. शेतीच्या उत्पन्नावर 50 टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सरकारने आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

 

या सरकारने फक्त शेतक-याच्या मालास भाव दयावा. बाकी काही देऊ नका, अशी मागणी करीत ते पुढे म्हणाले की, आज पर्यंत काँग्रेसने शेतक-याच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम केले. तेच काम भाजप देखील करीत आहे, अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

 

त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. कुठे गेले अच्छे दिन असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.