एमपीसी न्यूज – डिंबे-माणिकडोह 16 किलोमीटर बोगद्याचे तळपातळीपासून तातडीने काम सुरु करावे. कोल्हापुरी पद्धतीचे 65 बंधारे कुकडी प्रकल्पात समाविष्ट करु नये, साखळसाई उपसा सिंचन योजना, राळेगणसिद्धी उपसा सिंचन योजना, तुकाई उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पुण्यातील सिंचन भवनात आज (शुक्रवारी) एकदिवसीय उपोषण(Pune) केले.
या उपोषणात डॉमिनिक लोबो, विजय जठार, भगवान पठारे, इब्राहिम खान, विवेक पंदरकर, प्रवीण शिंदे, शिवाजी शिर्के, अनिल मगर, बाळासाहेब मुरकुटे मेजर, हरिश्चंद्र शिर्के, डी डी घोगरे, विजय मगर, संतोष साने, ब्रह्मानंद जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, अनिल गोटे, सुरेश भिसे आदी शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. भापकर यांनी म्हटले आहे की, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रावरून आज दि.(12) रोजी कुकडी पाण्याच्या विषयावर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. सहकार मंत्री वळसे पाटील यांनी एका पत्राद्वारे डिंबे–माणिकडोह 16 कि.मी. बोगदा प्रकल्प रद्द करावा. कोल्हापुरी पद्धतीचे 65 बंधाऱ्यांचा कायमस्वरूपी कुकडी प्रकल्पात समावेश व्हावा. तसेच म्हाळसाकांत, कमळजाई, बोरघर,फुलवडे या चार उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळावी अशा मागण्या वळसे पाटील यांनी केल्या आहेत.
या बैठकीसाठी श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा, पारनेर या विभागातील खासदार,आमदार,कालवा सल्लागार समिती सदस्यांना डावलून ही बैठक होत आहे. वळसे पाटील यांच्यावरील सर्व मागण्या एकतर्फी व हुकूमशाही पद्धतीने मंजूर झाल्या तर अहिल्यादेवी नगर, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनावर त्याचा खूप विपरीत परिणाम होऊन श्रीगोंदा, कर्जत, जामखेड,करमाळा, पारनेर तालुक्याचा वाळवंट होईल. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी सिंचन भवन येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. डिंभे माणिकडोह 16 कि.मी. बोगद्याचे तळपातळीपासून तातडीने सुरू करण्यात यावे. कोल्हापुरी पद्धतीच्या 65 बंधाऱ्यांचा समावेश कुकडी प्रकल्पात करण्यात येऊ नये. साखळाई, राळेगणसिद्धी, तुकाई उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यासाठी भापकर यांनी(Pune) उपोषण सुरू केले.
National : आता 25 जून ‘संविधान हत्या दिवस’
यावेळी मुख्य अभियंता (वि.प्र.) ह.तु.धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, उप.अधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांनी आंदोलन कर्त्याच्या शिष्टमंडळांबरोबर प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. सर्व मागण्या समजून घेतल्या. तुमच्या या सर्व मागण्या धोरणात्मक बाबी असून तुमच्या सर्व मागण्याबाबत मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाला सविस्तर रिपोर्ट सादर केला जाईल. आपण आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आंदोलनकर्त्यांना करण्यात आली. उप.अधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांनी मारुती भापकर यांना तसे लेखी पत्र उपोषणस्थळी आणून दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.