एमपीसी न्यूज – मान्सूनच्या हंगामात राष्ट्रीय महामार्गावर पाणी साठण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर पूर सज्जता आणि आकस्मिक प्रतिसादासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
डोंगराळ आणि मैदानी या दोन्ही प्रदेशात प्रभावी तोडगे काढण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाचा अवलंब करत प्राधिकरण इतर कार्यान्वयन संस्थासोबत समन्वयाने पूर प्रभावित ठिकाणांवर तातडीने यंत्रणा तैनात करण्यासाठी काम करत आहे. प्रभावी आपत्ती सज्जतेसाठी संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरण महत्त्वाची यंत्रसामग्री वेळेवर तैनात करण्यासाठी त्यांच्या उपलब्धतेवर देखील लक्ष ठेवत आहे.
Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, किती आहे पाणीसाठा?
महामार्गांवर पाणी साठून राहू नये यासाठी प्राधिकरण सिंचन विभागासोबत पाहणी करून कोणताही ओढा महामार्गामुळे अडवला जात नाही ना, हे सुनिश्चित करत आहे. शहरी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर, ज्या भागात पाणी साठून राहण्याची शक्यता आहे त्या भागात पुरेशा प्रमाणात पंपांची व्यवस्था करत आहे. डोंगराळ भागात, भूस्खलन प्रवण स्थानावर राज्य प्रशासनाच्या निकटच्या समन्वयाने पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा असलेल्या समर्पित आकस्मिक प्रतिसाद टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील 24×7 कनेक्टिव्हिटी सुरू राहील. अधिकारी पुराचा इतिहास असलेल्या विविध संरचनांची देखील तपासणी करत आहेत, जेणेकरून पुलांचे खांब आणि कमानींचे झालेले नुकसान लक्षात घेता येईल. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सावध करण्यासाठी असुरक्षित ठिकाणी इशारा देणारी चिन्हे बसवली जातील. भूस्खलनामुळे महामार्गावर ज्या स्थानांवर मार्ग बंद होईल, त्या स्थानांवर पर्यायी वळण शोधले जाणार आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा येथे पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत या भागाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.