एमपीसी न्यूज – जगभरात 16 जुलै हा दिवस जागतिक सर्प दिन म्हणून साजरा केला जातो. सापांविषयी असलेले गैरसमज आणि भीती दूर करत त्याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पिंपरी-चिंचवड शहर आणि लगत असलेल्या मावळ, खेड तालुक्यांत यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. मावळ परिसरात वन्यजीव रक्षक मावळ संस्था सापांसह इतर सर्वच प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करत आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था मागील अनेक वर्षांपासून वन्यजीवांचे रक्षण करत आहेत. त्यामध्ये दररोज 20-25 साप लोकवस्ती मधून सुरक्षित पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. कुठले ही वन्यप्राणी जखमी असल्यास त्यांना वनविभागामार्फत पुढे उपचारासाठी पाठवतात. ते प्राणी स्वस्थ झाल्यावर त्यांना निसर्गामध्ये मुक्त करतात. संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, सभासद सर्जेश पाटील, निनाद काकडे, जिगर सोलंकी, भास्कर माळी, तुषार सातकर, शत्रुघ्न रासकर, रमेश कुंभार, केतिका कासेटुर, रोहित पवार, मोरेश्वर मंदेकर यांच्यासह अनेक सभासद गावोगावी जाऊन सापांना वाचवतात आणि लोकांमध्ये जागृती करतात.
मावळ तालुक्यात सापांच्या एकूण 37 जाती नोंद झाल्या आहेत. त्यातील आठ साप विषारी आहेत. इतर निमविषारी व बिनविषारी आहेत. विषारी आठ जातींमधील नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चार जातीचे सर्प हे लोकवस्तीमध्ये आढळून येतात.
Chinchwad : ‘सिनर्जी मेडिकल योगा’ची रोप-बेल्ट थेरपी; सांधेदुखी बरी करा ऑपरेशन शिवाय
गेल्या अनेक वर्षात संस्थेचे कार्यकर्ते 21 हजार पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहचून सर्प आणि वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती करत आहेत. वनविभाग वडगाव, वनविभाग शिरोता आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात सर्प दिनानिमित्त सापांविषयी जनजागृती करण्यात आली. कोणताही सर्प किंवा वन्य प्राणी मारू नये असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून करण्यात आले आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे म्हणाले, “आपल्या घरा जवळ स्वच्छ्ता ठेवावी. रात्री बाहेर फिरताना पायात बूट आणि हातात टॉर्चचा वापर करावा. सर्प अथवा इतर वन्यप्राणी दिसल्यास त्याबाबत वन विभाग अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना माहिती द्यावी. कोणत्याही प्राण्याला मारू नये. प्रत्येक प्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीचा प्रमुख घटक आहे.”
संस्थेचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक जिगर सोलंकी म्हणाले, “मागील तीन वर्षांमध्ये आम्ही वनविभागासोबत शाळांमध्ये, गावांमध्ये जाऊन 12 हजार पेक्षा अधिक लोकांमध्ये सर्पाविषयी जनजागृती निर्माण केली आहे. सर्पदंश झाल्यावर वेळ न घालवता जवळच्या रुग्णालयात जावे. सर्पदंशावर औषध उपलब्ध आहेत.”
