एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 जागा (Pune)मिळणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच, लोकसभा निवडणुकीत झालेली चूक लक्षात आली आहे. ती चूक विधानसभेला होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आज रविवारी (२१ जुलै) प्रदेश कार्यकारणी अधिवेशन आयोजित केले आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत 60 जागा अल्पमतांनी गमवाव्या लागल्या. मंत्रालयावर भगवा फडकावयाचा आहे. प्रत्येक बूथवर दहा मतांची गरज आहे. अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने दहा ते पंचवीस मतदार वाढवा. नव्याने मतदार नोंदणी करा. मला काय मिळेल, याचा विचार न करता जागा वाटपाचा निर्णय महायुतीत होईल. राज्यातील14 कोटी जनतेला देण्यासाठी काम करा. माझा विश्वास आणि श्रद्धा तुमच्यावर आहे. तुम्ही हे कराल आणि महायुती 200 चा आकडा पार करेल. ही घमेंड नाही तर विश्वास आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.