एमपीसी न्यूज – भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूला(Bhosari ) खालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे भोसरीतील एका नागरिकाचा नाहक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्बन स्ट्रीटचे काम पाहणाऱ्या जबाबदार अधिकारी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
याबाबत उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे की,भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरी जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करत भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीटचे काम सुरू करण्यात आले. चार वर्षाहून अधिक काळ हे काम सुरू होते.
या कामामुळे वारंवार खोदाई सुरू होती. वाहतूक कोंडीचा देखील येथे सामना करावा लागत होता. चार वर्षाच्या या कालावधीत या अर्बन स्ट्रीटसाठी तब्बल 42 कोटीहून अधिक रक्कम खर्ची करण्यात आली. आणि अचानक हा अर्बन स्ट्रीट रद्द करण्यात आला. नागरिकांच्या घामाचा कर रूपाने मिळणारा पैसा असा एकीकडे वायफळ खर्च होत असताना दुसरीकडे अर्धवट केलेल्या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले.आणि आता हेच अर्धवट स्थितीतील काम नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
Pimpri :गुंडा विरोधी पथकाच्या तीन वेगवेगळ्या कारवाईत चार आरोपींना अटक
यापूर्वी अनेकदा प्रशासनाला याबाबत सूचित करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे भोसरीतील एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला उपरती होणार आहे का? या प्रकाराला सर्वस्वी महापालिकेचे बेजबाबदार अधिकारी, कामात कुचराई करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . आणि उड्डाणपूल खालील अर्बन स्ट्रीटचे कठडे आणि लोखंडी गज काढून टाकण्यात यावेत. या सर्व अपघात प्रकरणाची चौकशी करून अशा प्रकारे चुकीचे व अर्धवट काम केलेल्या संबधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच तातडीने भोसरी उड्डाणपूलाखाली ज्या ठिकाणी असे धोकादायक लोखंडी गज दिसून येतात त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात व भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात असे उबाळे यांनी म्हटले आहे.