Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:20 am

MPC news

लोकशिवार: गोपालनाचा जोडधंदा!

शेतीला पूरक धंदा म्हणून पशूपालनाकडे अनेक शेतकरी वळतात. यातही देशी गाईवर शेतकऱ्यांचा अगदी सुरुवातीपासून जीव. शेतातील चाऱ्यावर या गाईंचे पालन करत त्यापासून दुधाचा व्यवसाय करायचा. मल-मुत्रापासून खत मिळवायचे. नव्या वेतावर गोठा वाढवायचा असा हा गोपालनाचा व्यवसाय अनेक ठिकाणी दिसतो. या शेतीपूरक व्यवसायात नाव कमावलेल्या कुरुंदवाड येथील रामचंद्र डांगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या गोपालनाविषयी…

शेतीला पूरक धंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात. पशुपालन हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना जवळचा वाटणारा. त्यातही काही पशूंविषयी शेतकऱ्यांना वाटणारे ममत्व हे आणखीनच वेगळे असते. त्यात गाय या पशूचा समावेश होतो. विशेषत: देशी गाईवर शेतकऱ्यांचे मन अधिकच जडलेले असते. अनेक जण गाय नव्हे तर ह्यगोमाताह्ण असे समजूनच त्यांचे संगोपन करीत असतात. अशावेळी त्यांच्या लेखी फायदा तोट्याचा विषय हा गौण असतो. गोमातेची सेवा आणि गाईपासून होणारे फायदे घेणे हाच त्याचा केंद्रबिंदू असतो. अशीच मन:पूत गोसेवा कुरुंदवाड येथील रामचंद्र डांगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जपली आहे. शासन मान्यता असलेल्या रामेश्वर कृषी विकास विज्ञान मंडळाच्या माध्यमातून ते गोसेवा करीत आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे ८० देशी गायी आहेत. त्यामध्ये काहींनी भाकड म्हणून सोडून दिलेल्या, मोकाट फिरणाऱ्या पण लोकांनी पकडून आणलेल्या काही कसायाकडे पाठवल्या जात असताना गोसेवकांनी, पोलिसांनी पकडलेल्या अशाही गाईंचा समावेश आहे.

आपल्याकडे देशी गाईचे निस्सीम भावनेने संगोपन करण्याचा प्रघात आढळतो. मानवी जीवनात गाईंचे महत्त्व ऋषीमुनींनी ओळखलेले होते. गाईपासून होणारे फायदे तपासल्यानंतर भारतीय संस्कृतीत गाईला गोमातेचा दर्जा देण्यात आला. समृद्धीचे प्राचीन मापदंड म्हणूनही गाईकडे पाहिले गेले. म्हणजे गाईंची संख्या अधिक तितकी संपत्तीला स्थिती मजबूत मानण्याचा एका काळ होता. गाय हे संपत्तीचे प्रतीक मानले जात होते. भारतीय लोकांमध्ये गाय हा श्रद्धेचा विषय असल्याने गाईची सेवा करणारा शेतकऱ्यांमध्ये मोठा वर्ग आहे. राज्य सरकारकडून आता देशी गाईला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला आहे. देशी गाईंच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गाईंच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशी गाईचे संगोपन करण्यासाठी दरमहा १५०० रुपये (प्रतिदिन ५० रुपये ) अनुदान देण्याची घोषणा करून गो संगोपनाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे.

डांगे कुटुंबीयांनीही या गोपालनाकडे विशेष लक्ष पुरवलेले आहे. रामचंद्र डांगे, त्यांच्या मुलगा उदय यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय या गोपालनामध्ये सेवाकार्य म्हणून गुंतलेले आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील शेती करीत होते. शेतीचा विस्तार चांगला असल्याने त्याच्या जोडीला पशुपालन करावे असा विचार डांगे कुटुंबीयांनी केला. त्यातून मोठा गोठा बांधण्यात आला. म्हैस संगोपनाकडे लक्ष दिले. उच्च दर्जाच्य म्हशी आणल्या. पण व्यावसायिकदृष्ट्या हा व्यवसाय फलदायी ठरला नाही. त्यानंतर संकरित (जर्सी ) गाय संगोपणाकडे लक्ष वळवले. तोही आधी सारखाच फारसा यशस्वी ठरला नाही. हे दोन्ही व्यवसाय परवडत नाही असे लक्षात आल्यावर रामचंद्र डांगे यांनी आर्थिक फायद्याचा विचार न करता गो संगोपन करण्याचे ठरवले.

त्यासाठी सुरुवातीला जत, कवठेमहांकाळ परिसरातून सहा वर्षांपूर्वी गाई, पाडसे आणली. तेव्हा प्रत्येक गाईची किंमत १५ हजार रुपये होती. त्यामध्ये सहा मोठ्या गाई सात पाड्या यांचा समावेश होता. त्यांच्या संगोपनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. गोप्रजा वाढत गेली. काही नव्यांची भर पडत गेली. आता त्यांच्या गोठ्यामध्ये सुमारे ८० गाई आहेत. त्यामध्ये ६० खिलार गाई, वासरे, २ गिर गाई, वासरे, एक महिवाल गाय असे गाईचे गोकुळच फुललेले आहे. याच्या बरोबरीनेच परंपरागत शेळी, मेंढी संगोपन याकडेही त्यांनी काही प्रमाणात लक्ष पुरवलेले आहे. त्यांच्या परड्यात २० शेळ्या आहेत. डांगे कुटुंबीयांनी तेरवाड ( ता . शिरोळ ) या गावी रामेश्वर कृषी विकास विज्ञान मंडळाच्या माध्यमातून गोशाळा साकारलेली आहे. तेथे हे गोकुळ विस्तारत आहे.

त्यांच्या शेतामध्ये प्रामुख्याने ऊस, भात ही पिके घेतली जातात. तर गाईंना खाद्या म्हणून मका, जोंधळा याचेही उत्पन्न घेतले जाते. त्याचाच चारा या गाईंना खाऊ घातला जातो. ऊसशेती पुरेशी असल्याने डांगे यांचे एक गुऱ्हाळघर आहे. तेथे गूळ उत्पादित केला जातो. परंतु त्याच्या पुढे जात गोमय, गोमूत्र याची स्लरी खतापासू ऊस बनवून सेंद्रिय गूळ तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यासाठी चार टाक्या वापरात आणल्या जात आहेत. सध्या बायोगॅस बनवला जातो. त्याच्या ऊर्जेपासून गुऱ्हाळघर चालावे याकडे त्यांनी लक्ष पुरवले आहे. शिवाय स्वयंपाकाचा गॅस याच बायोगॅसपासून चालावा याला महत्त्व दिले आहे. गोपालन करताना एखादे चांगले खोंड – पाडे निपजले तर त्यालाही हौशी शेतकरी, शर्यतीप्रेमी लाखमोलाची किंमत देण्यास तयार असतात.

इतके मोठे देशी गाईंचे गोकुळ डांगे परिवाराकडे नांदत असले तरी त्यामध्ये फायद्याचा विचार हा दुय्यम असतो. दररोज सकाळ – संध्याकाळ २० लिटर दूध मिळते. देशी गाईला लागणारे खाद्या तुलनेने कमी असते. आणि दूधही कमी मिळते. त्यांना रोगराईचा उपद्रव कमी प्रमाणात असतो. गहू, भुसा याची पेंड खायला घातली जाते. दररोज एक ट्रॉली भरेल इतकी वैरण लागत असते. ही गोसेवा करताना किती खर्च होतो याचा वेगळा हिशोब ठेवला जात नाही. सेवा हा स्थायीभाव समजून हा जोडधंदा आनंदाने केला जातो. वयाची ऐंशी ओलांडली तरी स्वत: रामचंद्र डांगे हे गाईंची धार काढत असतात. त्यांच्याकडे तीन कामगार आहेत. ते स्वच्छता, शेण काढणे, गाईंना धुणे, वैरण आणणे, खाऊ घालणे अशी सारी कामे करीत असतात. त्यांच्या रामेश्वर मंडळ गोशाळेचे रामचंद्र डांगे हे अध्यक्ष आहेत. मुलगा उदय यांच्यासह कुटुंबीय मंडळात सदस्य आहेत. गोशाळेचा आणखी विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी शासनाकडे जागेचा प्रस्ताव सादर केलेला आहे. शासनाचे प्रति गाय १५०० रुपये मासिक अनुदान मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे डांगे कुटुंबीय शेती – व्यवसाय यांच्या बरोबरीने कुरुंदवाड नगरीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांत हिरिरीने सहभागी होत असतात. ३५ वर्षे नगरसेवक राहिलेले रामचंद्र डांगे, त्यांच्या पत्नी हौसाबाई, मुलगी कविता जोंग अशा तिघांनी दोन वेळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. मुलगा उदय, सून मनीषा हेही नगरसेवक आहेत. त्यांचे थोरले बंधू के. बी. डांगे हे डाव्या विचारांचे बिनीचे कार्यकर्ते होते. त्यांनीही नगरसेवक म्हणून प्रभावी ठसा उमटवला होता.

डांगे परिवारातील किमान तिघेजण तरी कुरुंदवाड नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून असतातच. शिवाय शहरातील कोणत्याही क्षेत्रातील कोणताही उपक्रम असो त्यामध्ये ते उत्साहाने सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य करीत असतात. राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हाच्या सुमारास रामचंद्र डांगे यांच्या राजकारणाची टिकटिक सुरू झाली. अलीकडे ते भाजपचे काम करीत असून तालुका प्रभारी पदाची जबाबदारी आहे. तर त्यांची सून मनीषा डांगे या जिल्हा महिला उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. राजकारण, समाजकारण, व्यवसाय व्यस्त असतानाही त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष पुरवलेले आहे. त्यातही त्यांनी गाईची सेवा करण्याला अधिक महत्त्व दिले आहे. यामागे त्यांची भावनाही तितकीच महत्त्वाची असल्याचे बोलण्यातून जाणवते.

देशी गाईंच्या विकास करणे, संशोधन करणे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. गाईच्या उत्पादनाचे संवर्धन करण्यावर त्यांनी भर दिला आहे. देशी गाईंचे दूध, लोणी, तूप याचा वापर लोकप्रिय करण्यावर त्यांचा भर आहे. सध्या त्यांच्याकडेचे गाईंचे पदार्थ घरीच वापरले जातात. उपपदार्थ करून विकण्याचे त्यांनी नियोजन केलेले आहे. पंचगव्यांवर आधारित औषधे (गाईचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप ) पासून औषधे तयार करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी या औषधांच्या महत्त्वाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित याही बाबींकडे त्यांनी लक्ष देण्याचे ठरवले आहे.

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर