Maval News : पवन मावळातील भडवली गावात 60 जणांना विषबाधा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भडवली (पवन मावळ) गावात सुमारे 60 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. गावातील मंदिरात असलेल्या कार्यक्रमात प्रसाद घेतल्यानंतर ही विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भडवली गावात भैरवनाथ मंदिरात काकडा आरती सोहळा सुरु होता. त्या आरती सोहळ्याची समाप्ती गुरुवारी (दि. 19) झाली. त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व नागरिकांनी मंदिरात प्रसाद घेतला. त्यानंतर काहींना उलट्या आणि अन्य त्रास सुरु झाले.

काही नागरिक औंध, काही प्राथमिक आरोग्य केंद्र तर काहीजण पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. सुमारे 60 नागरिकांना त्रास सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 10 ते 15 नागरिकांवर उपचार करण्यासाठी काही वेळ विलंब झाला. त्यानंतर रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले.

महाप्रसादातून या नागरिकांना विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.