Pune : कार विहिरीत पडून अपघात;नवविवाहितेसह दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यावरून परत येताना गाडी चालवण्याचा मोह जीवावर बेतला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात नवविवाहित महिलेसह दोघांचा मृत्य झाला. ही घटना गुरुवारी (9 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे गावात घडली.

सोनाली गणेश लिंभोणे (वय-22, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) आणि मारुती उर्फ दादा बबन खेडकर (वय-60, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) अशी मयतांची नावे आहेत. यातील मृत सोनाली हिचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळी कांचन जवळील एका गावातून लग्न सोहळा आटपून आपल्या गावी परत येण्यासाठी सोनाली ही गावातीलच मारुती उर्फ दादा बबन खेडकर यांच्या कारमध्ये बसली. यावेळी सोनाली यांना गाडी चालवण्याचा मोह झाला. मारुती उर्फ दादा बबन खेडकर यांनी होकार दर्शवल्याने ती स्टेअरिंगवर बसली. परंतु गाडी सुरू करताच तिचे नियंत्रण सुटले आणि गाडी पाठीमागे गेली आणि थेट तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली. काही वेळातच दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने गाडी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.