Alandi : साईबाबांच्या संदेशाला पुढे नेण्याचा भाविकांनी प्रयत्न करावा – रामदास आठवले (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – श्री साईबाबा हे तर ब्रम्हांडनायक ईश्वराचे मानवी रुप आहे, सर्व मानवजातील त्यांनी प्रेम, श्रध्दा, भक्ती, सबुरी व मानवतेचा संदेश दिला. त्यासाठी सर्वांनी साईबाबांचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आळंदी येथे केले.

आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील मुख्य कार्यक्रम महोत्सवाचे उद्‌घाटन खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, डॉ. चंद्रभानू सत्पथी आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, सत्य नेहमी आचरणात आणा. सर्व धर्म समान असून इतर घर्मांचा आदर करा. अहंकार सोडून द्या. साईबाबा देवस्थानसाठी लागेल ती मदत सरकारच्या माध्यमांतून करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

दिलीप कांबळे म्हणाले, “जाती-पातीच्या पलीकडे जाऊन साईबाबांनी सर्व समाजाला एकत्र येण्याचा संदेश दिला. साई बाबांनी दिलेल्या मार्गावर सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करा”

डॉ. चंद्रभानू सत्पथी म्हणाले, “साई भक्ताने कोणत्याही कामात स्वतमध्ये उच जीवनमूल्यांची वृध्दी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण नेहमी सदाचरण आणि सचोटीचीच कास धरावी. ईश्वर हीच सेवा आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगात व्यावसायिक, वैयक्तिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असो सहिष्णुता, करुणा, सचोटी, त्याग आणि वैराग्य यांचे पालन केले पाहिजे”

महापौर राहूल जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.