Pimpri News : महापालिकेतील 75 अधिकारी, कर्मचा-यांच्या अदल्याबदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, भांडारपाल, सहायक भांडारपाल, मीटर निरीक्षक, संगणक ऑपरेटर यांचा समावेश आहे.

उच्च न्यायालयाने सन 2011 मधील एका जनहित याचिकेवर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांबाबतचे सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेने गट अ, ब, क आणि ड या श्रेणीतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांसंदर्भात 13 फेब्रुवारी 2017 रोजी परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत.

गट अ आणि ब मधील अधिका-यांकरिता एकाच विभागात काम करण्याचा कालावधी साधारणपणे तीन वर्षाचा आहे. तर, गट क मधील कर्मचा-यांकरिता एकाच विभागात काम करण्याचा कालावधी साधारणपणे सहा वर्षाचा आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या जातात. एकाच ठिकाणी नियमित कालावधी पूर्ण झालेले अधिकारी, कर्मचारी बदल्यास पात्र ठरतात. कोरोना महामारीमुळे यंदा बदल्यांना विलंब झाला. तथापि, नवनियुक्त आयुक्तांनी बदल्यांचा मोठ्या प्रमाणावर धडाका लावला आहे.

2 जुलै रोजी 18 लिफ्टमनची बदली केल्यानंतर 11 जुलै रोजी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 4, उपअभियंता (स्थापत्य) 27, कार्यकारी अभियंता (विद्युत) 4, उपअभियंता (विद्युत) 2, सहायक आरोग्याधिकारी 4 यांच्या बदल्या झाल्या. तर, आज झालेल्या बदल्यांमध्ये कनिष्ठ अभियंता 32, भांडारपाल 7, सहायक भांडारपाल 2, मीटर निरीक्षक 15, संगणक ऑपरेटर 19 यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचा-यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, रुजू न झाल्यास, बदली आदेशाचा अवमान केल्यास तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बदल्यांसाठी दबाव आणणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई!

महापालिकेच्या विविध विभागांमधील बदल्यांत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने की काय, पण ‘बदल्यांसाठी राजकीय दबाव आणणारे अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश प्रशासन विभागात देण्यात आले आहेत. कर्मचा-यांच्या सेवा शर्ती व अटींमध्येच हे नमूद करण्यात आलेले असते. तथापि, वर्षांनूवर्षे या गोष्टीची पायमल्ली होत आली आहे. बदल्यांसाठी राजकीय लोकप्रतिनिधींची पत्रे सतत फिरत असतात. या पत्रांच्या आधारे बदल्या करवून घेणा-यांचीही कमतरता नाही. बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांची नेहमीच चर्चा सर्वत्र होत आली आहे. त्यामुळे बदल्यांसाठी राजकीय दबाव आणू नये, यासाठी प्रशासन विभागातर्फे यापूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा याबद्दल बजावण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.