75th Independence Day : सुराज्य व्हावे असा संकल्प करून स्वातंत्र्य दिन साजरा करूया !

एमपीसी न्यूज (पराग गोखले) – आपल्या क्रांतिकारकांच्या त्यागातून आणि त्यांच्या  प्राणांच्या बलिदानातून इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी आणि गुलामगिरीच्या राजवटीतून आपल्या देशाला सोडवले, यामुळेच आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू शकत आहोत. या वर्षी 15 ऑगस्टला भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. आपल्याला स्वराज्य मिळाले आहे, मात्र सुराज्य स्थापन झाले नाही. जर आपल्याला आदर्श व्यवस्था हवी असेल, तर जनतेने जागरूक होणे महत्त्वाचे आहे. आपण आपले अधिकार जाणून संविधानिक मार्ग अवलंबून सुराज्य व्हावे, असा संकल्प करून आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन साजरा करूयात!

राष्ट्रप्रेम आणि एकजुटीचा अभाव यामुळे भोगावे लागलेले पारतंत्र्य 
इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. भारत स्वतंत्र होण्याआधी मुघल, पोर्तुगीज, आदिलशहा, कुतुबशहा व इंग्रज यांसारख्या अनेकांनी भारतावर राज्य केले.  व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले. अशा मूठभर इंग्रजांनी लाखोंची संख्या असलेल्या आपल्या देशावर 150 वर्षे राज्य केले. आपल्यातील संघटन शक्तीच्या अभावामुळे इतक्या कमी संख्येने आलेले परकीय आपल्यावर राज्य करू शकले. आपल्यावर दुसरे कोणीतरी राज्य करत आहेत; ते जुलमी आहेत, हे लक्षात येऊनही केवळ राष्ट्रप्रेमाचा अभाव आणि एकजुटीचा अभाव यामुळे हे परकीय आपल्यावर राज्य करू शकले. योग्य त्या वेळी या गुणांचा वापर न झाल्याने आपल्याला पारतंत्र्यात रहावे लागले

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजाला प्राणापलीकडे जपणारे देशभक्त 
तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ हा ध्वज भारतावर फडकत होता. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेच्या विरोधात जे जे उठाव, लढे, सत्याग्रह झाले, त्या त्या वेळी भारताचा तिरंगी ध्वज हातात धरून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणपणाने लढा दिला. अनेक जणांनी हा ध्वज छातीशी कवटाळून मरण पत्करले; पण ध्वज जमिनीवर पडू दिला नाही किंवा मरण येईपर्यंत हातातून निसटू दिला नाही, हा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या काळात तिरंगा हाती घेणे, हा गुन्हा ग्राह्य धरला जात असे. अशाही परिस्थितीत हा ध्वज राष्ट्रभावना निर्माण करत होता. ध्वज आठवला की राष्ट्राबद्दल आपले कर्तव्य आठवायचे.‘वंदे मातरम्’ हा त्या काळचा राष्ट्रीय महामंत्र राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या शरीरातील पेशी पेशींमधून निनादू लागायचा.

भारतीय नागरिकांनी राष्ट्रध्वजाबाबतची जाणीव विकसित करायाला हवी!
भारतीयांनो, राष्ट्रध्वज व राष्ट्राची अन्य प्रतीके यांच्याकडे संकुचित वृत्तीने न पहाता त्याबाबतची जाणीव विकसित व्हायला हवी. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे, त्याचा योग्य तो मान राखणे, हे राष्ट्राभिमानाचे लक्षण आहे. त्याग, क्रांती, शांती व समृद्धी या मूल्यांची  शिकवण राष्ट्रध्वजाकडून आपल्याला मिळते. उत्साहापोटी राष्ट्रध्वजाचा अतिवापर, गैरवापर करतांना या मूल्यांना पायदळी तुडवले जाते, हे लक्ष्यात येत नाही. खरे तर राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, ते गुण आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.

राष्ट्रध्वजाचा होणार अवमान रोखा!
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, तसेच ते पायदळी तुडवले जाताना दिसतात. काही जण तर तिरंग्याच्या रंगाप्रमाणे चेहरा रंगवतात.यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत असल्याचे प्रतिवर्षी पहावयास मिळते. याची जाणीवही कित्येकांना नसते. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का?

या वर्षीपण दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ करून लावणे हे देशप्रेम व्यक्त करण्याचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे, असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणारे, व्यक्ती, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करता यावी यासाठी जागरूक नागरिकांनी पोलीस-प्रशासनाकडे तक्रार करायला हवी. हे हीआपले राष्ट्रकर्तव्य निभावावे.  पोलीस-प्रशासनानेही जागरूक राहून राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.

राष्ट्रीय सणांच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया 
15 ऑगस्ट या दिवशी सकाळी ध्वजवंदन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु हल्ली यादिवशी फिरायला जाणे, उशिरापर्यंत झोपणे, घरात दूरदर्शनचे कार्यक्रम पहात बसणे अशा कृती होताना दिसतात. त्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून ध्वजवंदन करणे अधिक संयुक्तिक ठरते.

सध्याच्या ‘मेकॉले’च्या शिक्षणप्रणालीमुळे नागरिक सुशिक्षित होत आहेत पण सुसंस्कारी असतीलच असे नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही विविध क्षेत्रातील काही मान्यवर लोकांकडून  भ्रष्टाचार केला जातो. यामुळे सामान्य जनतेची फसवणूक होते आहे. यामुळे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचे आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्या स्वातंत्र्य दिनी सुराज्यासाठी याचा संकल्प करूया. हीच खरी क्रांतिकारकांप्रती कृतज्ञता होय.

संकलक : श्री. पराग गोखले
संपर्क : ८९८३३३५५१७

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.