Pune : शेतकरी दुष्काळात होरपळत असताना भाजप-शिवसेना राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणत आहे – शरद पवार

एमपीसी न्यूज – राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळतो आहे, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. ते करण्याचे सोडून आणि लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत भाजपा आणि शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, समाजवादी नेते सुभाष वारे, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, रामाच्या मूर्तीची उंची किती असावी ? यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याना सविस्तर चर्चा करायची आहे मग जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आहे का ? आपल्या देशात अनेक भाषा आणि प्रांतातील नागरिक राहत असताना देखील आज देश भक्कम उभा आहे. त्याच प्रमुख कारण हे आपल्या देशाचं संविधान आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या एका नेत्याने संविधान दुरुस्तीच्या नावाखाली संविधान बदलण्याची भाषा केली. यातून त्यांना मूठभर लोकांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.