पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिओम शनिवारी रात्री मुंबई-बेंगलोर महामार्गावरून कारमधून जात होते. रात्री साडेअकराच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल कोल्हापुरी येथे असलेल्या एका पानटपरीवर ते सिगारेट घेण्यासाठी थांबले. त्यावेळी अज्ञात तिघेजण त्यांच्या मोटारीत येऊन बसले.
हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा कारमध्ये बसले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या पोटाला पिस्तूल लावले आणि कार पुढे घेण्यास सांगितले. हरिओम यांनी ‘काय झाले?’ अशी विचारणा केली असता एकाने ‘तुला मरायचे आहे काय,’ असा दम दिला. यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एकाने हरिओम यांच्यावर गोळीबार केला. ती गोळी हरिओम यांच्या पायाला लागली. यामध्ये ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.