Pune : धरणांत 97 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकर पाण्यापासून वंचित

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत तब्बल 96.70 टक्के पाणीसाठा तरीही, पुणेकर पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. दसरा असताना पुणेकरांना पाणी मिळत नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 1.36 टीएमसी, पानशेत 10.65 टीएमसी, वरसगाव 12.82 टीएमसी, तर टेमघर धरणात 3.36 टीएमसी असा एकूण 28.19 टीएमसी म्हणजेच 96.70 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 25.79 टीएमसी म्हणजेच 88.46 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी निसर्ग राजाने चांगली हजेरी लावली. चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला. पण, पुणेकरांना 2 वेळ चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत. ऐन सणासुदीच्या काळात कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

शहरातील पेठा, आपटे रस्ता, हडपसर, शिवाजीनगर, वारजे – माळवाडी, कोथरूड, बोपोडी, वडगावशेरी, येरवडा भागात नागरिकांना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हडपसर भागात पाणी नाही तर, मत नाही असे फलक झळकत आहे. पुरेसे पाणी मिळणे आपल्या हक्काचे आहे, आपला पाणी प्रश्न सुटत नसेल तर मग आपण मतदान का करायचे? असा सवाल आपटे रोडवरील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. काल पाणी मिळण्यासाठी बोपोडी भागातील महिलांनी पुणे महापालिका आवारात मोकळ्या हंड्यांनी दांडिया खेळला. ऐन निवडणुकीत प्रशासनाचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.