Aashadhi Vari : आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ‘लालपरी’तून प्रवास

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती :

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशी निमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची “लालपरी ” धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परिवहनमंत्री परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालख्यांबरोबर 19 जुलै रोजी या बस पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचनाही परब यांनी दिल्या.

या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरी पर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील, असेही परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.