Maharashtra News : रेशनकार्ड आधार क्रमांकाला जोडा, नाही तर मार्चपासून रेशन बंद

एमपीसी न्यूज : रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राहकाचे रेशनकार्ड आधार क्रमांकाला जोडणे बंधनकारक केले होते. त्याची मुदतही १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु अद्यापही अनेकांनी आधारकार्ड रेशनकार्डला जोडले नसल्याने अशा कार्डधारकांचे मार्च महिन्यापासूनचे रेशन बंद होणार आहे. त्यामुळे ज्या कार्डधारकांनी आधार लिंक केले नसेल अशांना आता ते तत्काळ लिंक करावे लागणार आहे.

वारंवार होणारे रेशन घोटाळे तसेच पात्र नसलेल्या ग्राहकांची नावे यादीत समाविष्ट करत त्यांच्या नावाने उकळले जाणारे रेशन आणि यातून होणारी शासनाची फसवणूक बंद करण्यासाठी शासनाने रेशन वितरण प्रणालीमध्ये माेठे बदल केले आहेत. बायोमेट्रिक प्रणालीसह धान्याचे वितरण तसेच प्रत्येक रेशनकार्डला आधारकार्ड लिंक करणे, रेशन कार्डला नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. यातून पात्र आणि खरोखर गरज असलेलेच लाभार्थी समोर येतील.

त्यामुळे आपोआपच इतरांची नावे कमी होतील. साहजिकच त्यांचे धान्यही वाचेल. हे धान्य इतर गरजू नवीन लाभार्थींना देणे शक्य होईल, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येकाचे आधारकार्ड रेशन प्रणालीला लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यास जानेवारी अखेरची दिलेली मुदतही वाढवून १५फेब्रुवारी केली होती. आता ही वाढीव मुदत देखील संपली आहे.

त्यामुळे ज्यांचे आधार जोडले असेल त्याच लाभार्थींना धान्य मिळेल. इतरांना धान्य मिळणार नाही. त्यांनी धान्य घेण्यासाठी आपल्या घराजवळील स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपले आधार तत्काळ लिंक करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.