Pimpri : राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर खासदार डॉ. कोल्हेंची भेट झाली का? आढळराव म्हणतात…
एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत कोल्हे यांनी बाजी मारली. परंतु, आता राज्यात दोन्ही पक्षांची युती झाली आहे. त्यामुळे नेत्यांची मात्र गोची झाली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. शिरुर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, राष्ट्रवादीने शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना आढळराव यांच्या रिंगणात उतरविले होते. निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. डॉ. कोल्हे यांनी सलग तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरु होते. विधानसभा निवडणुकीत देखील ते पहायला मिळाले.
आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाविकास आघाडी झाली आहे. तीनही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली का? असे विचारले असता शिवाजीराव आढळराव यांनी तत्काळ ‘नाही’ असे उत्तर दिले. तसेच थोडा पॉज घेऊन तुम्ही असे का विचारले, तुम्ही दिलीपराव वळसे-पाटील यांची भेट झाली का? असे विचाराल पण तुम्ही डॉ. कोल्हे यांची भेट झाली का असे विचारले, असेही आढळराव म्हणाले.