Pune : …एक वेळ मुलाला पळवून आणतो असे म्हटले असते तर समजून घेतले असते!

अजित पवार यांची राम कदम यांच्यावर टीका 

एमपीसी न्यूज – एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करतात. एक वेळ मुलाला पळवून आणतो, असे म्हटले असते तर ते आम्ही समजून घेतले असते. त्यामुळे एका महिलेला मदत झाली असती, अशी टीका अजित पवार यांनी राम कदम यांचे नाव न घेता केली. बालगंधर्व येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना पवार यांनी कदम यांच्या वक्तव्याचा मिश्कील भाषेत निषेध केला. यावेळी बोलताना ते म्हणाले मुलाला जसं मुलगी पसंत करण्याचा अधिकार आहे तसा तो मुलीला पण असायला हवा. याउलट आम्ही मुली पळवून आणण्यास मदत करू अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत.

अशा वक्तव्यानंतर चूक झाली ती मान्य करून माफी मागणे तर दूरच राहिले याऊलट खेद व्यक्त करत स्वतःचे समर्थन देखील करीत आहेत. भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवता? यासाठी तुम्हाला समाजाने निवडून दिलं आहे का? काही वयात पाय घसरतो, काही चुकते, अशा वेळी वडीलधाऱ्यांनी त्यातून त्याला सावरले पाहिजे. त्यांना समजावले पाहिजे. मात्र, हे न करता वाट्टेल तशी बेताल व्यक्तव्य करण्यात काही जण धन्यता मानतात ही समाजातील शोकांतिका आहे. याचा बारकाईने विचार केला पाहिजे. तेवढ्यापुरते ऐकून सोडून देऊन चालणार नाही, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.