Nashik News : अखिल भारतीय किसान सभेचा ‘नाशिक ते मुंबई वाहन मोर्चा मुंबईकडे रवाना

एमपीसी न्यूज : दिल्लीत आंदोलन करणा-या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी आज घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा घेऊन आज हजारो शेतकरी इगतपुरी येथे विसाव्यासाठी स्थिरावले.

दिल्लीत आंदोलन करणा-या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी आज इगतपुरीमध्ये घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा घेऊन आज मंदिर परिसरात विश्रांतीसाठी थांबले होते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी निघालेला हा जत्था केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत.

मूठभर कॉर्पोरेटस्ना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जातोय. यास विरोध करण्यासाठी गेल्या 58 दिवसांपासून देशातील पाचशे शेतकरी संघटना एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढा देत आहे. दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा ‘नाशिक ते मुंबई वाहन मोर्चा आज सकाळी मुंबईकडे रवाना झाला. सोमवारी आझाद मैदानावर जमून सरकार विरोधात एल्गार करण त्यानंतर ते राजभवनवर जाऊन निवेदन देतील.

“लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू’ या जिद्दीने या मोर्चात राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवले. शेतकरी न्यायहक्कांसाठी लढा देत असताना सरकार मनमानी करत आहेत. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा सोमवार पर्यंत चालणार आहे.

राज्यभरातून हजारो आंदोलक वाहनांमधून घटनदेवी मंदिर परिसरात जमा झाले होते. मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. इगतपुरी वरून निघालेला वाहन  मोर्चा 24 तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यांनंतर 25 तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून 26 जानेवारीपर्यंत चालेल.

तीन कृषी विरोधी व चार कामगार विरोधी कायदे,प्रस्तावित वीज बिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये 50 हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होतील व लढा व्यापक करतील. जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती डॉ.ढवळे यांनी दिली.

यावेळी डॉ. ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड, राज्य सचिव डॉ अजित नवले, सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, ‘डीवायएफ’च्या नेत्या प्रीती शेखर आदी उपस्थित होते.

भोजनासाठी सोबत शिधा…

सलग तीन दिवस आंदोलक मुंबईत जमणार आहेत. शेतकरी, कामगार आंदोलकांनी सोबत शिधा आणला आहे. मात्र गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, सिटू प्रणित कामगार संघटना मदत जमा करून भोजन व्यवस्था करणार आहेत अशी माहिती डॉ.डी. एल. कराड यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.