Akurdi News : ‘रेशनवर तेल, डाळी, इतर जीवनावश्यक वस्तू द्या’
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी
एमपीसी न्यूज – सरकार रेशनवर फक्त गहू आणि तांदूळ देते. अन्नसुरक्षा कायद्यातील अंतर्भूत गोडेतेल, साखर, शेंगदाणे, चहा, पौष्टीक डाळी, तिखट, मीठ या वस्तूंचा देखील सरकारने रेशनमध्ये समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वंचित, उपेक्षित आणि दारिद्र्य रेषेच्या खाली 40 कोटी जनता आहे.
तसेच रोजंदारी व अशास्वत कामाचे स्वरूप असलेला एक लाखाहून जास्त श्रमिक वर्ग पिंपरी चिंचवड शहरात आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून अन्नसुरक्षा कायद्यातील अंतर्भूत गोडेतेल, साखर, शेंगदाणे, चहा, पौष्टीक डाळी, तिखट मीठ या वस्तूंचे रेशनसहीत वाटप करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
अपर्णा दराडे, शैलजा कडूलकर शीतल जेवळे, रिया सागवेकर,शेहनाज, शेख, आशा बर्डे, वैशाली थोरात, विद्या सोनकांबळे, संगीता देवळे, निर्मला येवले, सुषमा इंगोले, रंजिता लाटकर, गोदावरी गायकवाड आदींनी ही मागणी केली आहे.