Akurdi News: करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांशी पाटील यांनी आज (शुक्रवारी) संवाद साधला. महापौर उषा ढोरे, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, पद्मा भोसले. व्ही. एस. काळभोर, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती किती बिघडली आहे. त्या बिघडलेल्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातील माणूस अस्वस्थ आहे. हा सिग्नल जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘अ‍ॅण्टी एस्टॅब्लिशमेंट’ मतदान करणे म्हणजेच सरकारच्या उमेदवाराला पाडणे असे होणे आवश्यक आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला!

पुणे पदवीधर मतदारसंघातून सलग भाजपचा उमेदवार विजयी होत राहिला आहे. उत्तमराव पाटील, दोनवेळा पुण्यातील नारायणराव वैद्य, प्रकाश जावडेकर आमदार राहिले. 2002 ची टर्म भाजप अनपेक्षितपणे हरली. केवळ 90 मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यावळेचे जनता दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद पाटील विजयी झाले होते. परंपरागत सीट गेल्याची सल भाजपच्या मनात होती. त्यामुळे संघटनेने मला उमेदवारी दिली. 2008 मध्ये मी पदवीधरमधून 9 हजारच्या मताधिक्याने जिंकलो. 2014 ला पण पुन्हा जिंकलो. पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मला बारा वर्ष पदवीधरचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या कालावधीत शिक्षक, प्राध्यापकांचे खूप प्रश्न मार्गी लावले. महाराष्ट्रातील 3700 शाळांचा मागे कायम विनाअनुदानित पडते होते. त्यामुळे त्यांना ग्रँड मिळत नव्हते. पगार होत नव्हते. त्यातून कायम शब्द काढण्यात यशस्वी झालो. ग्रँड 40 टक्यांपर्यंत दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.