Alandi Crime News : ‘आम्ही येथील भाई आहोत’, असे म्हणत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – हातात लोखंडी कोयते घेऊन पादचाऱ्यांना शिवीगाळ करीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीला धकावत त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) साडे आठच्या सुमारास आळंदी येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय पुरूषाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोपी घायाळ, रवि रमेश पवार (रा. केळगाव, आळंदी) व नरेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरूष, त्यांची पत्नी, आत्या, दोन मुले असे सर्वजण नाकोडा मंदिराच्या मागे निळेगल्ली या ठिकाणी गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी तीन ते चार जणांचे टोळके (एम एच 12/एसबी 5447) व (एमएच 12/ सीजी 4660) या दोन दुचाकी रस्त्यात लावून गोंधळ घालत होते. तसेच नागरिकांना शिवीगाळ करत त्यांच्यावर थुंकत होते. फिर्यादीने त्यांना विरोध केला व असे न करण्यास सांगितले.

त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी हातात लोखंडी कोयते, गज व दांडके घेऊन फिर्यादीस धमकावले. ‘आम्ही येथील भाई आहोत, तू कोण आम्हाला सांगणार, जा काय करायचे ते कर’, असे म्हणत दम भरला. आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. तसेच अरोपीनी सार्वजनिक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक जोंधळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.