Alandi : मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देवस्थानचे दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात
एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा समाधी सोहळा (Alandi) व कार्तिकी यात्रेनिमित्त मंदिरामध्ये व महाद्वारामध्ये आकर्षक नयनरम्य अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे. त्यामुळे नागरिक महाद्वारासमोर मंदिराबाहेर सेल्फी फोटो काढताना दिसत होते. मंदिर व मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंदिरामधील, भक्तीसोपन पूल, नदीपलीकडील दर्शनबारीमध्येसुद्धा भाविकांच्या सोयी सुविधेसाठी मोठ्या प्रकाशाचे दिवे लावण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरची व्यवस्था, वारकरी भाविकांसाठी विविध सूचना माहितीसाठी स्पीकर व्यवस्था तिथे करण्यात आली आहे. देवस्थानचे दर्शनबारी काम अंतिम टप्प्यात आले आहे.
कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच कोरोना निर्बंधमुक्त आळंदी कार्तिकी यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येण्याची शक्यता देवस्थानच्या वतीने वर्तवली आहे. त्यामुळे नदीपलीकडील दर्शनबारी व्यवस्था भाविकांसाठी अपुरी पडण्याची शक्यता आहे. संबंधित संस्थेच्या मालकाच्या काही जागेच्या भागामध्येच दर्शनबारीचे काम होणार आहे. त्यामुळे दशमी व एकादशी कार्तिकी यात्रेवेळी वारकरी भाविकांच्या लांबच लांब दर्शनबारी बाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे. दर्शनमंडप जागा न्याय प्रविष्ट झाल्यानंतर कोरोना कालावधीत व त्यानंतर तेथील व शेजारील जागेत इमारत, कंपाउंड असे विविध बदल झाल्याने दर्शनबारीसाठी प्रशस्त जागाच तिथे उरली नाही. याबाबतची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
वारकरी संप्रदायाला मातेस्वरूप असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नमामि गंगा, नमामि चंद्रभागा या धर्तीवर नमामि इंद्रायणी हा प्रकल्प हाती घेण्यात यावा. जेणेकरून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होईल. या इंद्रायणी नदीमध्ये भाविक भक्त, वारकऱ्यांना स्नान करता येईल असे एका वृत्त संस्थेला देवस्थान विकास ढगे पा. यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगरपरिषद, इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या ग्रामपंचायत या सर्व घटकांनी एकत्र येऊन राज्यशासन किंवा केंद्रशासनाच्या माध्यमातून इंद्रायणी नदी कशी प्रदूषण मुक्त होईल यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी आणि कार्तिकी निमित्ताने लाखो भाविक भक्त आळंदीत दर्शनासाठी येत असतात.
त्यांना सुसज्ज अशी दर्शनबारी उपलब्ध व्हावी, तसेच दर्शनबारीसाठी (Alandi) जी जागा आहे ती कायमस्वरूपी आरक्षित करून त्या जागेचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणी प्रशासनाकडे आम्ही केली आहे.