Pune: माऊली व तुकोबांच्या पादुकांसाठी वापरलेल्या दोन्ही बस देवस्थानांना देऊन टाका – विशाल तांबे

एमपीसी न्यूज – यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका स्पर्शाने पवित्र झालेल्या दोन्ही बस आळंदी आणि देहू संस्थान यांना कायमस्वरूपी देण्यात याव्यात, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा पायी वारीने पूर्ण होऊ शकला नाही. पण, महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घेऊन ही परंपरा खंडित न होता, पूर्ण निगराणीखाली बसमध्ये या पादुका पंढरपूरला रवाना केल्या. वारकरी संप्रदायाच्या अस्मिता व आस्थेच्या प्रश्नावर तोडगा निघाला.

यावर्षी ही वेगळी परंपरा सुरू होऊन त्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दोन्ही बसेस कायमस्वरूपी माऊलींच्या सेवेसाठी देण्यात याव्यात. या बसेसचा भविष्यात व्यावसायिक वापर होऊ नये, गरज पडेल तिथे माऊलींच्या पालखी बरोबर शासनाचा संदेश घेऊन पायी वारी पालखी सोहळ्यात संस्थान मार्फत वापरल्या जातील, असे तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा अंश व भावनिक अस्तित्व अनुभवलेल्या या बस पावन आणि पवित्र माऊली सेवेसाठी राखीव ठेवल्या जातील. पाळखी सोहळा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा व सर्वसामान्य शेतकरी, वारकरी संप्रदायाच्या आस्थेचा मुद्दा असून, त्यावर यथोचित निर्णय घेऊन त्या दोन्ही बसेस संस्थांच्या ताब्यात वर्ग कराव्यात, असेही विशाल तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.