Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.

मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर (रा. आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तुकाराम आसाराम बोडखे (वय 35, रा. गोरक्षनाथ संस्थान खोपकर, ता. श्रीरामपूर, अहमदनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एप्रिल २०१९ ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडली. केळगाव आळंदी येथे फिर्यादी बोडखे आणि आरोपी मीनाक्षी या दोघांनी जागा घेऊन एकत्र बांधकाम केले. त्या बांधकामाचा जिना दोघांनी सामायिक ठेवला. बोडखे यांनी केलेल्या बांधकामाची कागदपत्रे बोडखे यांच्या नावावर आहेत. तरीही मीनाक्षी यांनी बोडखे यांच्या घरावर आपला ताबा सांगितला. दरम्यान, मीनाक्षी यांनी बोडखे यांच्यावर एक गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बोडखे आळंदी येथून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास गेले. तरीही मीनाक्षी बोडखे यांच्या घरावर ताबा सांगत होत्या. आरोपी गोरख महाराज यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला मीनाक्षी यांना दिला. आरोपींनी संगनमत करून बोडखे यांच्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश केला. तीन लाख रुपयांची खंडणी मागत प्रकरण मिटवण्यासाठी दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.