Alandi : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीस कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून पती-पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने आणि काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री चाकण चौक, आळंदी येथे घडली.

ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे (वय 42, रा. चाकण चौक, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय दिलीप उडाफे, मनोज दिलीप उडाफे (दोघे रा. चाकण चौक, आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी असे सर्वजण त्यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी अक्षय तिथे आला. त्याने ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या भांडणाचा आवाज ऐकून आरोपी मनोज घरातून धावत आला.

‘तुम्हाला लय माज आलाय. तुम्ही नेहमी आमच्या सोबत भांडण करता’ असे म्हणत त्याने ज्ञानेश्वर यांच्या पायावर कोयत्याने मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी ज्ञानेश्वर यांच्या पत्नी आल्या असता आरोपींनी त्यांनाही कोयत्याने मारले.

आरोपी अक्षय याने दांडक्याने ज्ञानेश्वर आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. ज्ञानेश्वर यांची मुलगी भांडणे सोडविण्यासाठी आली असता आरोपींनी मुलीला देखील हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.