Alandi : पाहुण्यांना बोलावले म्हणून भर मांडवात मोडले लग्न; वधु पित्याची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – मुलीचे लग्न असल्याने वधूपित्याने त्यांच्या सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिले. त्यातील ठराविक दोन पाहुण्यांना का बोलावले, या कारणावरून वराकडील मंडळींनी भरलेल्या मांडवातून लग्नाला माघार घेतली. याबाबत वधूपित्याने पोलिसात धाव घेतली. ही घटना शुक्रवारी (दि. 17)दुपारी पावणे एकच्या सुमारास आळंदी येथील साई मंगल कार्यालय येथे घडली.

राकेश अर्जुन परमाळद (वय 40, कुळगाव बदलापूर (पूर्व), ता. अंबरनाथ) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकल ईश्वरसिंग कचवाय, विद्या अजित गौड, अजित गौड, प्रदीप पुजारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश यांची मुलगी रितू हिचा विवाह विकल याच्याशी ठरला. शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास आळंदी येथील साई मंगल कार्यालयात त्यांचा विवाह समारंभ सुरू होता. मुलीचा विवाह असल्याने राकेश यांनी त्यांच्या सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिले. त्यामध्ये राकेश यांचे जवळचे पाहुणे सोनूलाल परमाळ आणि राजू शंकर चव्हाण हे देखील उपस्थित होते.

या दोघांना लग्नसमारंभासाठी बोलावल्याचा रागातून आरोपींनी लग्न समारंभ सुरू असताना लग्नाला माघार घेतली आणि लग्न समारंभातून निघून गेले. वराकडील मंडळींनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे वधूपिता राकेश पुरते भांबावले. राकेश यांनी तात्काळ आळंदी पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.