Alandi : ​माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पाऊले चालती पंढरीची वाट; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले दर्शन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून अलंकापुरीत दाखल झालेल्या लाखो वारक-यांच्या मुखी ‘माऊली-माऊली’ हा एकच जप होता.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 7.15 मिनिटांनी विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणा पूर्ण करून गांधीवाडय़ात (आजोळी) एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुगडीचा आनंद घेऊन दर्शन घेतले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. माऊलींच्या पालखीचा मुक्काम परंपरेनुसार गांधीवाडय़ात (आजोळी) आहे. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यांतून एकेक दिंडय़ा मंगळवार सकाळपासून मोठय़ा संख्येने आळंदीत दाखल झाल्या आहेत.

  • प्रस्थानापूर्वी पहाटे पावणेतीन ते साडेचार घंटानाद, काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेचार ते दुपारी बारावाजेपर्यंत भाविकांनी महापूजा व समाधी दर्शन घेतले. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत श्रींना नवेद्य दाखवण्यात आला. दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47 दिंडय़ांना प्रवेश देण्यात आला. तसेच श्रींना पोशाख चढवण्यात आला. माऊलीच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली आणि लाखो वारक-यांनी केलेल्या ‘ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.