Alandi : आळंदीत इंद्रायणी नदीतील पांढऱ्या फेसामुळे नागरिकांत नाराजी  

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या पाण्यात प्रदूषित पाणी येण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून वाढल्याने आळंदीत इंद्रायणी नदीतील पाण्याला पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे. नदीचे प्रदूषण वाढल्याने आळंदीत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वाढते प्रदूषण आळंदीत डोकेदुखी वाढली आहे. आळंदी पालिका प्रशासनाने नदीचे प्रदूषण वाढल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.

आळंदीतून वाहत असलेल्या नदीचे प्रदूषण पिंपरी महापालिकेच्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दुर्लक्षाने प्रचंड वाढले आहे. नदी प्रदूषणाने आळंदी परिसरात ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायात नाराजीचा सूर उमटत आहे. पिंपरी महानगरपालिकेच्या हद्दीतून नदीत रसायन व मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न होता येत आहे. सोमवारी आळंदी येथील नदीत पांढऱ्या पाण्याचे फेसाने नागरिकांत नाराजी वाढली. आळंदी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने या बाबत मुख्याधिकारी समीर भूमकर यांना माहिती देऊन उपाय योजना करण्यास सांगितले.

पाणी पुरवठा केंद्रात पाण्यावर जल शुद्धीकरण करणे या दूषित पाण्याने त्रासाचे झाले. नागरिकांना पाणी पुरवठा करताना नगरपरिषदेच्या यंत्रणेवर त्यामुळे ताण येत आहे. येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने पाणी उकळून, गाळून पिण्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणात दूषित पाणी, केंद्रात येत असल्याने त्यावर प्रक्रिया करून पाणी पुरवठा करताना वेळ लागत आहे. यामुळे आळंदीत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मिळणारे पाणी नागरिकांनी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.