Toll Plazas News : खरंच ! वर्षभरात देशातील सर्व टोलनाके हटवणार

एमपीसी न्यूज : पुढील एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अंमलजबावणी केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.

मी सभागृहाला आश्वस्त करु इच्छित आहे की, पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील. याचा अर्थ टोलवसुली जीएसच्या माध्यमातून केली जाईल. जीपीएसमधून काढण्यात येणार्‍या फोटोंच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं. टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचे सांगत नितीन गडकरींनी युपीए सरकारवर निशाणा साधला.

नितीन गडकरी यांनी यावेळी फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणार्‍या वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश आपण दिला असल्याची माहिती दिली. वाहनांना फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरीची केस दाखल होईल असेही ते म्हणाले आहेत.

फास्टटॅगच्या माध्यमातून टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पेमेंटला चालना देण्यात आली असून २०१६ मध्ये ही यंत्रणा आणण्यात आली होती. १६ फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला असून त्याशिवाय प्रवास कऱणार्‍यांना वाहनांना दुप्पट टोल भरावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.