Pimpri : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती; सामाजिक न्याय विभागाकडून अध्यादेश जारी 

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा अध्यादेश आज (शुक्रवारी) जारी केला आहे. गोरखे यांच्या रुपाने पहिल्यांदाच महामंडळाला उच्चशिक्षित आणि युवा अध्यक्ष मिळाला आहे. 

अमित गोरखे यांची 12 मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्याबाबतचा अध्यादेश जारी केला नव्हता. सामाजिक न्याय विभागाने आज (शुक्रवारी) गोरखे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा पहिला आदेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे,समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. यासाठी महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली. हे महामंडळ कंपनी कायदा अधिनियम, 1956(1) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिनांक 11 जुलै1985 रोजी अस्तित्वात आले आहे.

महामंडळातर्फे मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. महामंडळाचे सुमारे 300 कोटीचे बजेट आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे युवा नेते, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांची नियुक्ती झाली आहे. गोरखे यांच्या रुपाने पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राकडे अध्यक्षपद आले आहे. उच्चशिक्षित आणि युवा अध्यक्ष महामंडळाला मिळाला आहे.

अमित गोरखे म्हणाले, ”लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विकासासाठी निधी दिला जाईल. मातंग समाजाची प्रगती करण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहे. समाजातील तरुणांना शिक्षणासाठी मदत केली जाईल. याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर काम करण्याची संधी मिळणार आहे. आजपर्यंत महामंडळाला उच्चशिक्षित अध्यक्ष लाभला नव्हता. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ मातंग समाजातील तळागाळातील लोकांना होत नव्हता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत विश्वासाने मला अध्यक्षपद दिले आहे. त्या पदाला 100 टक्के न्याय देणार आहे. आजपर्यंतचा अनुभवपणाला लावून पारदर्शक आणि स्वच्छ काम करण्यावर भर दिला जाईल. अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षाचे मनापासून आभार मानतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.