India Corona Update : देशात चार दिवसांत 16 लाख रुग्णांची वाढ, 16 हजार मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गुरुवारपासून दररोज 4 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत देशात तब्बल सोळा लाख कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मागील चार दिवसांपासून दररोज चार हजारांहून अधिक रुग्णांचा देखील मृत्यू होत असून, गेल्या चार दिवसांत 16 हजार कोरोना रुग्ण दगावले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 4 लाख 03 हजार 738 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 86 हजार 444 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 37 लाख 36 हजार 648 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 81.90 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 30 कोटी 22 लाख 75 हजार 471 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 65 हजार 428 चाचण्या शनिवारी (दि.08) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे बदल केले आहेत. त्यानुसार रुग्णांला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. तसेच, एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.