Maharashtra Corona Update : चिंता वाढली ! दिवसभरात तब्बल 55,469 नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोना रुग्णांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 55 हजार 469 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आजवरची राज्यातील सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे. 

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 लाख 13 हजार 354 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 25 लाख 83 हजार 331 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 34 हजार 256 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.97 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज 297 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 56 हजार 330 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 24 लाख 55 हजार 498 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 22 हजार 797 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 09 लाख 17 हजार 486 नमूने तपासण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा तसेच, 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.