Pimpri : माहिती अधिकाराने सामान्य माणसाला मोठे बळ! – विवेक वेलणकर
एमपीसी न्यूज – “शासकीय कर्मचारी अटकेला घाबरतात; तर राजकीय व्यक्ती खुर्ची जायला घाबरतात म्हणून त्यांना जाब विचारण्याची गरज असते! माहिती अधिकार कायद्यामुळे सामान्य माणसाला खूप मोठे बळ प्राप्त झाले आहे. पूर्वी मनी पॉवर, मसल पॉवर किंवा नॉलेज पॉवर असेल तरच कामे होत असत; पण माहिती अधिकार कायद्यांतर्गत वीज, बँक, विमा, टेलिफोन अशा विविध दैनंदिन सुविधांबाबत नागरिकांना कायद्यातील नियम आणि तरतुदी जाणून घेत गैरसोयीं विरोधात दाद मागता येते.
असे असले तरी सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यासाठी संघटित गुंडगिरी विरोधात कार्यकर्त्यांनी संघटित होऊन सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे!” असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मत व्यक्त केले.
जागृत नागरिक महासंघ संचालित अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती ( महाराष्ट्र राज्य)च्या द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्य साधून माहिती अधिकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार, राज्यभरातील विविध शाखा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र प्रदान सोहळ्यात विवेक वेलणकर बोलत होते. निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे, ‘अ‘ व‘ज‘ परिमंडल अधिकारी दिनेश तावरे, दैनिक सामाजिक कार्यकर्ते अॅड. रमेश महाजन, ‘यशदा‘तील प्रशिक्षक भावना चौधरी आणि अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष नितीन यादव आदी उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात पुरोगामी चळवळीचा मानदंड अशी ओळख असलेले व्ही.आय.(आबा) पाटील, पलुस तालुका शाखाध्यक्ष कॉ.अर्जुन जाधव, सांगवी व सातारा जिल्हा शाखाध्यक्ष प्रकाश पाटील, मावळ तालुका शाखाध्यक्ष दत्तात्रय काजळे, खेड तालुका शाखाध्यक्ष किरण थोरवे, दौंड तालुका शाखाध्यक्ष अर्जुन टुले, कराड तालुका शाखाध्यक्ष संजय चव्हाण, सुनीता साळुंखे, जळगाव जिल्हा शाखाध्यक्ष विशाल शर्मा, जेजुरी शाखाध्यक्ष किशोर खोमणे यांचा समावेश होता. यावेळी राज्यातील विविध शाखांमधील कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.
अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “ब्रिटिश काळात असलेला ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 2005 साली संपुष्टात येऊन माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. शासनावर अंकुश ठेवणारा हा कायदा म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मास्रच आहे म्हणून त्याचा जपून आणि सकारात्मक कार्यासाठीच उपयोग केला पाहिजे!” अशा भावना व्यक्त करीत माहिती कायद्यांतर्गत समितीने केलेल्या विविध सामाजिक कामांची माहिती दिली. अड.रमेश महाजन यांनी, “माहिती अधिकार कायद्याने समाजात, प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणला; पण अशा स्वरूपाचे अनेक कायदे होण्याची गरज आहे!” असे मत व्यक्त केले. निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांनी, “शासनाकडे असलेली माहिती ही जनतेच्या मालकीची असते यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. सर्वसामान्य नागरिक हा जाणता झाला; तरच लोकशाही प्रभावी होईल!” असे विचार व्यक्त केले.
पुरस्कारार्थींच्या वतीने आबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस नागरिक मित्र संघटना अध्यक्ष फडतरे आणि सचिव राहुल श्रीवास्तव यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी नितीन यादव आणि रोहिणी यादव या दांपत्याचा कार्यकर्त्यांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
राजेश विश्वकर्मा, डॉ.वसंत भांदुर्गे, अशोक कोकणे, रोहिणी यादव, उमेश सणस, शिवाजीराव शिर्के, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती सहसचिव उमेश सणस यांनी आभार मानले.