Rajgurunagar : आयटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे यांना महाराष्ट्र ग्रामविकास पुरस्कार प्रदान
एमपीसी न्यूज- ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाबाजी पवळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना साहित्यिक व कवी म. भा.चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय “महाराष्ट्र ग्रामविकास गौरव ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे, विलास भोईर, सुभाष गोरडे, विलास शिंदे, रामदास दोंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाबाजी पवळे हे आरटीआय कार्यकर्ते असून अगदी तरुण वयापासून सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात काम करत आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत तसेच त्यांनी शौचालयाच्या बोगस नोंदी शासन दरबारी कागदोपत्री झाल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये उघडकीस आणले होते व सदर बोगस नोंदी रद्द करून पात्र लाभार्थीना शौचालयाचे अनुदान मिळवून दिले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाने तातडीने दखल घेऊन राज्यात चौकशी केली असता सुमारे आठ लाख शौचालयांच्या बोगस नोंदी कागदोपत्री केल्याचे आढळून आले होते.
तसेच पवळे यांनी वैयक्तिक लाभांच्या योजनेमधून पुणे जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारस रद्द करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल मिडिया व पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केला आहे. अतिशय “निर्भीड” पणे काम करणाऱ्या पवळे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.