Balewadi:  पुण्यात 2019 अखेर मेट्रो धावणार – पंतप्रधान मोदी 

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा आयटी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे. गेल्या चार वर्षांत मेट्रोचे जाळे विस्तारले जात असून पुण्यात 2019 अखेर मेट्रो धावणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच पुण्यासह महाराष्ट्रातील आठ शहरे स्मार्ट केली जाणार आहेत. अमृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात मोठे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणा-या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधान मोदी बोलत होते. बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, “पुणे आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिलं. मेट्रोचा देशातील सर्वात जास्त आयटी हबला फायदा होणार आहे. स्थानिक नागरिकांना वाहतुकीची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. 2019 अखेर पर्यंत पुण्यात 12 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावणार आहे.

मागील साडेचार वर्षात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. कारगिल ते कन्याकुमारी, कच्छ ते कानोर पर्यंत विकासकामे सुरु आहेत. यामागे केवळ सरकारचा प्रयत्न आणि सर्वसामान्य नागरिकांची इच्छाशक्ती आहे. शासनाने बनविलेल्या पब्लिक प्रायव्हेट पॉलिसी अंतर्गत बनणारा देशातील पहिला प्रकल्प शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो आहे. मेट्रोसह अन्य सार्वजनिक वाहतूक सेवांना जोडण्याचा आणि त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला आणखी थोडा अवधी मिळाला असता.  तर,  आजपर्यंत मुंबई आणि परिसरातील महत्वाच्या शहरात मेट्रो धावली असती. देशाचा संतुलित विकास हेच आमचं ध्येय आहे. महाराष्ट्राच्या आठ शहरांना स्मार्ट सिटी बनविणार. सामान्य नागरिकांचा शासकीय योजना आणि सिविधांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल इंडिया अभियान सुरु आहे. जवळपास प्रत्येक सुविधा ऑनलाईन करण्यात आली आहे. यातून भ्रष्टाचार कमी करण्यात आला आहे. वाहन चालक परवाना सोबत बाळगण्याची गरज नाही. डीजी लॉकरच्या माध्यमातून ते डिजिटली सोबत बाळगता येणार आहेत. स्वस्त मोबाईल फोन आणि स्वस्त इंटरनेट प्लॅन यामुळे जीवन सुखकर झाले आहे. जगातील दुस-या क्रमांकावर भारतात मोबाईल निर्मिती होत आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक सुविधा आपल्याकडे आहेत. तज्ञ मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे. नव्या भारताच्या नीतिमीमध्ये पुण्याची भूमिका महत्वाची असणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हिंजवडीचा जगात नावलौकिक आहे. अशा महत्वाच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या आहे. जे लोक ज्ञान, तंत्रज्ञानाची निर्मिती करतात, त्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी मेट्रो करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तम वाहतूक व्यवस्था करण्यास आम्ही कटिबद्ध. शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतूक सुविधा मिळणार आहे. आयटी कर्मचा-यांचा प्रवास सुखकर झाल्यास त्यांची इफिशियंसी वाढेल. त्यातून देशाचे उत्पन्न वाढेल. महाळुंगे-माण देखील हायटेक सिटी होणार, त्यासाठी प्रशासन स्तरावर प्लॅन सुरु आहे. रिंगरोडचे काम लवकरच सुरु होणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक हजार ग्रीन बसेस सुरु करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.