Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ उपक्रमांचा शुभारंभ 

पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघू उद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात आज (रविवारी, दि. 31) हा कार्यक्रम पार पडला. ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला, सचिन पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर, ससुनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, एच.डी.एफ.सी. बॅकेच्या श्रृती नंदुरबार, ॲक्सीस बॅकेचे योगेश हरणे, बंधन बँकेचे सत्यजीत मोहिते, रत्नाकर बँकेचे मिलिंद विचारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट प्राप्त केले तर मोठया प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला , अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय , फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुर करु इच्छिणा-या युवक युवतींनी पुढे यावे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनायोध्यांचा गौरव करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत तुम्ही केलेले काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचे सर्व श्रेय कोरोना योध्यांना जाते. कोरोना कालावधीत डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.