Bhosari : पाणीपुरवठा सुरळित करा, भाजप नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज – एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. भोसरीतील गवळीनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजप नगरसेविका प्रियंका बारसे यांनी केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेविका बारसे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. तरी देखील दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनाला तात्पुरती मान्यता दिली होती. परंतु, दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

प्रभाग क्रमांक पाच गवळीनगरमधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. कमी वेळच पाणी येते. दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. रात्री-अपरात्री पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन नियोजनांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे त्वरित थांबवावे. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी नगरसेविका बारसे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.