Bhosari : बांधकाम आणि जलतरण तलावाचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी दिले आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाणी कपात करुन शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. पण, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने पिंपरी-चिंचवड शहरात जलतरण तलाव, बांधकामे आणि वॉशिंग सेंटर यांना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी आयुक्ताकंडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पवना धरणांत २५ टक्के पाणी साठा राहिला आहे. हा साठा ३० जूनपर्यंत पुरेसा ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या वतीने नेहरुनगर, भोसरी, थेरगाव, केशवनगर, मोहननगर, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी, यमुनानगर, संभाजीनगर, पिंपरीगाव, प्राधिकरण, निगडी असे तेरा ठिकाणी जलतरण तलाव सुरु आहेत.

  • सर्व तलावांवरील बोअरिंग बंद असल्याने पिण्याचे पाणी वापरले जात आहे. उन्हाळी सुटयांमुळे मुले, तरुण व नागरिक त्याचा आनंद घेत आहे. तेथील टॅक, शॉवर, नळ व स्वच्छतागृहातही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी जलतरण तलावांमध्ये खर्ची पडत आहे.

बिल्र्डर्सच्या मोठमोठ्या साईट शहराच्या विविध भागात सुरु आहेत. बहुतेक साईटला महापालिकेचाच पाणीपुरवठा आहे. दररोज लाखो लिटर पाणी बांधकामावर खर्च होते. शहरात वॉशिंग सेंटर्सची संख्या मोठी आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटीमुळेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.