Break the chain : पुणे, साताऱ्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम, 25 जिल्ह्यांना दिलासा
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकारने अनलॉक बाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांना याचा दिलासा मिळणार आहे. मात्र, पुणे, साताऱ्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम राहणार आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी रूग्ण कमी होताय तिथल्या नागरिकांसाठी हा दिलासा देण्यात आला असून, ज्या भागात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. लेवल तीनच्या अंतर्गत 4 जून व 17 जून रोजी लागू करण्यात आलेली नियमावली 11 जिल्ह्यांत लागू राहणार आहे.
यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे.
सातारा, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर
🚨🚨#BreakTheChain – Modified Guidelines pic.twitter.com/uGyIKEKiXW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
नव्या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. यासाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय, वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील. तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळं ही बंदच असणार आहे.