Rathani: बीआरटी मार्गावरील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे यांची मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे रहाटणी पिंपळेसौदागर येथील औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर विकसित होत असलेल्या उड्डाणपुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना निवेदन दिले आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला आजही प्रेरणादायी आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या बलिदानाबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या प्रत्येक राज्यातील व्यक्तीला माहिती आहे.
या बलिदानाचे स्मरण व्हावे. यासाठी औंध रावेत बीआरटीएस या मार्गावर रहाटणी पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकातील नव्याने विकसित होत असलेल्या उड्डाण पुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.